बंगळुरू – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज असून मालिका ताब्यात घेऊन आपला दबदबा असल्याचे दाखविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
ही मालिका खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा असताना ऑस्ट्रेलियाने पहिला सामन्यात एकतर्फी विजय मिळविला. परंतु दुसरा सामना जिंकत भारताने 1-1 अशी बरोबरी साधत मालिकेतील आव्हान कायम राखले. भारताने राजकोटमध्ये प्रत्येक क्षेत्रात शानदार कामगिरी करून पराभवाची परतफेड केली.
विशेष म्हणजे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने फलंदाजीतील अपयश धुवून काढले. केएल राहुलनेही पाचव्या स्थानावरील संधीचा पुरेपूर फायदा उठविला. तर रोहित शर्मा आणि शिखर धवनने डावाची चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार विराट कोहली आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर खेळला आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर आला. रविवारीही अशीच फलंदाजी क्रम कायम राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी क्षेत्ररक्षण करताना रोहित दुखापतग्रस्त झाला होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमवर निर्णय सामन्यासाठी तो उपलब्ध होईल, असा विश्वास कोहली याने व्यक्त केला आहे.
तसेच जखमी ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडेला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु तो सामन्यासाठी फिट होऊ शकेल की नाही हे पाहावे लागेल. राजकोटमध्ये भारतासाठी सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे राहुलचा डाव ठरला. यामुळे संघ संतुलन सुधारण्यास मदत होणार आहे. कोहलीने तर ही राहुलची सर्वोत्तम खेळी असल्याचे वर्णन केले. पंतच्या अनुपस्थितीत त्याने विकेटकीपिंग करत ऍरोन फिंचला मोठ्या चपळाईने यष्टीचित करत दोन झेल घेतले. गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नसून तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजांसह संघ मैदानात उतरू शकतो.
गेल्या काही काळापासून कुलदीप यादवच्या कामगिरीत सातत्य दिसून येत नाही. परंतु अखेरच्या सामन्यात त्याने ऍलेक्स कॅरी आणि स्टीव्ह स्मिथला एका षटकात बाद करत सामना फिरविला. तसेच कुलदीपबरोबर युजवेंद्र चहलला खेळण्याची संधी मिळू शकेल. दुखापतीतून जसप्रीत बुमराह सावरल्याने भारतासाठी ही एक सकारात्मक बाब आहे. याशिवाय शेवटच्या षटकांत मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनीही चांगली गोलंदाजी केली आहे.
राजकोटमध्ये विजय मिळाल्याने संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशने फॉर्मात आहे. मिचेल स्टार्कने अखेरच्या सामन्यात 78 धावा केल्या होत्या. यामुळे या निर्णायक सामन्यात त्याच्या अडसर ठरू शकतो. तसेच पॅट कमिन्सने आपल्या 60 एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत 98 बळी घेतले आहेत. मुंबईत कमिन्सने 2 बळी घेतले, मात्र राजकोटमध्ये त्याला अपयशाचा सामना करावा लागला.
विराट, रोहितच्या कामगिरीकडे लक्ष
कर्णधार विराट कोहलीला 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 17 धावांची गरज आहे. तर उपकर्णधार रोहित शर्माला 9 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 4 धावांची गरज आहे. रोहितच्या खात्यात सध्या 8 हजार 996 धावा जमा आहेत. त्यामुळे या सामन्यात दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.