मुंबई – महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा होता. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंना या निकालाचा मोठा धक्का बसल्याच दिसून आलं आहे.
दरम्यान, आता शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच राज्यभर दौरा करणार आहे. त्यामध्ये ‘शिवगर्जना शिवसंकल्प सभा’ उद्धव ठाकरे घेत आहे. आज 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेड भागात पहिली जाहीर सभा होणार आहे. ‘सर्व शिवसैनिकांना सांगा ही सभा विराट झाली पाहिजे, त्यांचे डोळे पांढरे झाले पाहिजे’ असं देखील उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.
उद्धव ठाकरे यांची ही सभा रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या खेडमध्ये होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता ही जाहीर सभा होणार असून, कार्यकर्त्यांकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंची आजची कोकणातील सभा झाल्यानंतर त्यांची दुसरी सभा 26 मार्च ला मालेगाव येथे होणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी काहीदिवसांपूर्वीच सांगितलं आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलतांना याबद्दल खुलासा केला होता.