मराठी विनोदी लेखक, पटकथालेखक, किशोर मासिकाचे संपादक आणि नाटककार वसंत सबनीस यांचा आज स्मृतिदिन. “तमाशा’ या लोककला प्रकाराला ते आधुनिक रूप देणारे पहिले नाटककार. त्यांचा जन्म सोलापूर येथे 6 डिसेंबर 1923 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपूर येथे झाले तर, पुणे येथे पुढील शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी केली. नोकरी करीत असताना लेखन करू लागले. त्यांनी काव्यलेखनाने मराठी साहित्याच्या सेवेचा आरंभ केला. वर्ष 1958 मध्ये “पानदान’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह प्रसिद्ध झाला.
अभिरूचीसारख्या दर्जेदार नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यानंतर ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक मंडळातर्फे “किशोर’ चालू केले व उत्कृष्ट छपाई, आधुनिकतेची जोड देऊन व मुलांना आवडेल, असे लेखन यामुळे हे मासिक विद्यार्थीवर्गात प्रसिद्ध झाले. रंगभूमीवर त्यांची नाटकेही गाजली. दादा कोंडके, राम नगरकर या अभिनेत्यांचा अभिनय व सबनीसांच्या खुसखुशीत संवादांना प्रचंड दाद मिळाली. मार्मिक ग्रामीण राजकीय भाष्य आणि चतुर संवाद हे त्यांच्या लोकनाट्यांचे वैशिष्ट्य. “छपरी पलंग’ या त्यांच्या लोकनाट्याला नवी दिशा देणाऱ्या “विच्छा माझी पुरी करा’ या त्यांच्या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली. “विच्छा’ने नाट्यक्षेत्रात क्रांती केली. दादा कोंडके व राम नगरकर व नंतर विजय कदम यांनी हे नाटक पुढे नेले.
सबनीस शहरी संस्कृतींमध्ये राहात असताना तितक्याच सहजतेने ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करीत असत. त्यामुळे ग्रामीण बाजातील विनोद आणि चातुर्याची ओळख पांढरपेशा वर्गाला करून दिली. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातील नाटकगृहामध्ये चमकू लागली. त्यांना ग्रामीण भागातील लोककलांबद्दल आपुलकी होती. वर्ष 1993 मध्ये, ते नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा “मराठी नाटकांनी लोककलांची पुरेशी दखल न घेतल्याबद्दल’ त्यांनी खंत व्यक्त केली.
त्यांनी सुमारे 45 वर्षे आपल्या लेखणीतून विनोद निर्माण केला. अनुभवापलीकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त कल्पना शक्ती होती. “गोंधळात गोंधळ’ आणि “खिचडी’ या व्ही. के. नाईक यांच्या दोन चित्रपटांसाठी वसंतरावांनी लेखन केले. “गोंधळात गोंधळ’चे चित्रीकरण सुरू करताना नाईक यांना आयत्या वेळी एक कल्पना सुचली. नाईकांनी वसंतरावांना फोनवरून ही कल्पना सांगितली. या कल्पनेवर पंधरा मिनिटांत हा सीन लिहून रणजीत स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी नाईकांकडे सोपविला. त्यांच्या शीघ्रलेखनाची यावरून प्रचिती येते.
“सोंगाड्या’ रूपेरी पडद्यावर आला आणि निर्माते दादा कोंडके, वसंतराव ही जोडी जमली. “एकटा जीव सदाशिव’सुद्धा वसंतरावांनी दादांसाठी लिहिला; परंतु नंतर द्विअर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहिणेही नाकारले. सचिनबरोबर त्यांनी “नवरी मिळे नवऱ्याला’, “गंमतजंमत’, “एकापेक्षा एक’, “अशी ही बनवाबनवी’, “बाळाचे बाप ब्रह्मचारी’, असे विनोदी आणि सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले. त्यांच्या दोन विनोदी नाट्यकृतींना 1963 व 1972चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. 15 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांचे निधन झाले.