भारताचे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 25 जून 1931 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठावरील दईया या गावात झाला. त्यांचे पूर्वज ऐतिहासिक माणिकपूरच्या राज्याचे शासक होते. माणिकपूर राज्याची स्थापना वर्ष 1180 मध्ये कनोजचे राजे जयचंद यांचे भाऊ राजा माणिकचंद यांनी केली होती. विश्वनाथ यांनी कर्नल ब्राउन केंब्रिज स्कूल, डेहराडूनमधून शिक्षण घेतले आणि अलाहाबाद विद्यापीठातून कला आणि कायद्याची पदवी प्राप्त केली. नंतर पुणे विद्यापीठाच्या फर्गसन कॉलेजमधून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली.
विश्वनाथ हे अलाहाबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्षही होते. तसेच वाराणसीच्या उदय प्रताप कॉलेजच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी सार्वजनिक व राजकीय जीवनास सुरुवात केली. वर्ष 1957 मध्ये भूदान चळवळीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. विश्वनाथ यांनी आपल्या जमिनी धर्मादाय संस्थांना दिल्या.
त्यांना विद्यार्थीदशेतच राजकारणाची आवड निर्माण झाली होती. त्यांना युवा राजकारणात यश मिळाले व ते भारतीय कॉंग्रेस पक्षाशी जोडले गेले. वर्ष 1969 ते 1971 मध्ये ते उत्तर प्रदेश विधानसभेत निवडून गेले व वर्ष 1980 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत पोचले. त्यानंतर 29 जानेवारी 1983 रोजी ते केंद्रीय वाणिज्य मंत्री झाले. व्ही. पी. सिंग हे राज्यसभेचे सदस्यही होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना वर्ष 1984 मध्ये ते भारताचे अर्थमंत्रीही झाले. स्वीडनने वर्ष 1987 मध्ये बातमी प्रसारित केली की भारताच्या बोफोर्स कंपनीशी तोफांचा सौदा झाला होता, ज्यामध्ये 60 कोटी रुपये कमिशन म्हणून देण्यात आले होते. ही बातमी भारतीय प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचल्यावर ही “बातमी’ संसदेत चर्चेसाठी आली. या पर्दाफाशमुळे राजीव गांधींनी व्ही. पी. सिंग यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी केली. यावर धुराळा उडत असताना 1989 च्या निवडणुकाही आल्या.
व्ही. पी. सिंग आणि विरोधकांनी याला निवडणुकीचा मुद्दा म्हणून महत्त्व दिले. विद्याचरण शुक्ला, रामधन, सतपाल मलिक आणि इतर असंतुष्ट कॉंग्रेसजनांसह व्ही. पी. सिंग यांनी 2 ऑक्टोबर 1987 रोजी स्वतंत्र आघाडी स्थापन केली. या मोर्चात भारतीय जनता पक्षही सामील झाला तसेच डाव्या पक्षांनीही आघाडीला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर 6 ऑगस्ट 1988 रोजी सात पक्षीय आघाडीची स्थापना करण्यात आली. 1989 च्या लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्या. राष्ट्रीय आघाडीला बहुमत मिळाले. व्ही. पी. सिंग स्वतःला पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सांगत होते. पण चंद्रशेखर आणि देवीलाल हेही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सामील झाले. व्ही. पी. सिंग यांची पंतप्रधानपदी व चौधरी देवीलाल यांना उपपंतप्रधान बनविण्याचा निर्णय आघाडीने घेतला.
विश्वनाथ प्रताप सिंग हे अतिशय शुद्ध स्वभावाचे होते आणि पंतप्रधान म्हणून त्यांची प्रतिमा मजबूत आणि सामाजिक-राजकीय दूरदर्शी होती. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारून ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला. देशातील आरक्षणातील जातिव्यवस्थेचे संतुलन साधण्याचा प्रयत्न केला. 27 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांचे निधन झाले.