भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत
त्रिवेन्द्रम, दि. 24 – आज येथे सचिवालयावर सुमारे 5 हजार लोकांचा मोर्चा येऊन निदर्शने झाली. पाच विरोधी पक्षांच्या संयुक्त कृति समितीतर्फे झालेल्या या निदर्शनात भ्रष्टाचारी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, ही मागणी करण्यात आली.
नर्मदा पाणी प्रकल्प करार
नवी दिल्ली – नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करण्यासंबंधी आज महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेश यांच्यामध्ये एक करार झाला. या नदीवर आठ ठिकाणी पाटबंधारे योजना तयार होणार आहेत. या करारानुसार गुजरात, मध्य प्रदेश यांच्या हद्दीत प्रत्येकी चार प्रकल्प उभे राहतील.
सभापतींच्या दृष्टीने खासदार लिंगभेदरहित
नवी दिल्ली – लोकसभेच्या सदस्यांना माझ्या दृष्टीने स्त्री-पुरुष भेद नाही, असे उद्गार सभापती धिल्ला यांनी काढले. तसेच माझ्या दृष्टीने सर्व सदस्य सभ्य गृहस्थ आहेत, असेही सभापती महोदय म्हणाले.
मुळा नदीवर धरण होणार
संगमनेर – अकोले तालुक्यात मुळा नदीवर खडकी आणि आंबीत येथे धरणे बांधून संगमनेर, अकोले भागातील पठार भागाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी सुगंधराव देशमुख यांनी केली. राहुरी तालुक्यात मुळा धरण झाले असले तरी मुळेचे 20 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या पाण्याचा उपयोग पठार भागात कायापालट होण्यासाठी करावा.