तिरुमला : तिरुपती दर्शनास येणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानच्यावतीने दोन महत्त्वाचे निर्णय घेतली असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पायी दर्शनास जाणाऱ्या भाविकांसोबत पंधरा वर्षांखालील मुले असतील तर त्यांना पहाटे पाच ते दुपारी दोन या वेळेतच घेऊन जाण्यास परवानगी असेल, तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या भाविकांना सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत डोंगरावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत जंगली श्वापदांनी लहान मुलांना लक्ष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर वरील निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी रविवारपासून सुरू झाली आहे.
तिरुपतीमधून तिरुमलाला जाण्याच्या घाटरस्त्यावर अलीपिरी ते गलीगोपुरम, श्री. लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर आणि घाटातील अन्य एका वळणासह पाच ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून आलेला आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेतल्याचे देवस्थानचे अध्यक्ष बी. करुणाकर रेड्डी यांनी सांगितले.
दरम्यान, रस्ता आणि घाटामध्ये यात्रेकरूंच्या सुरक्षेसंदर्भात तिरुपती येथील विश्रामगृहात जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ आधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे.
सोमवारी होणाऱ्या बैठकीत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. वन्य श्वापदांचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत यात्रेकरू भाविकांनी देवस्थानकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे भाविकांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.