बुध -धुळे, नंदुरबार, मराठवाडा व मध्य प्रदेशातील शेकडो ऊसतोड कामगार लॉकडऊनमुळे खटाव तालुक्यातील बुध, फडतरवाडी, काटेवाडी परिसरात अडकून पडले आहेत. या सर्वांवर शेतांमध्ये मजुरी करण्याची वेळ आली आहे.जरंडेश्वर साखर कारखान्याचा हंगाम 30 मार्चला संपल्यानंतर हे ऊसतोड कामगार परत फिरण्याच्या तयारीत असतानाच करोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू झाले. संचारबंदी व जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्याने या कामगारांना परत जाण्यासाठी वाहने मिळेनाशी झाली. त्यातच पुन्हा लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्याने या कामगारांचा धीर आता सुटत चालला आहे. जवळचे पैसे संपल्याने या कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
ऊस तोडणीसाठी शिरपूर (धुळे), जालना व मध्य प्रदेशातून आलेल्या आठ ते दहा टोळ्या नेर तलाव परिसरातील काटेवाडी, फडतरवाडी येथील शिवारात वास्तव्यास आहेत. हाताला काम नाही, खिशात दाम नाही आणि सरकार घरी जाऊ देत नाही. अशा स्थितीत खोपटात राहून संसार कसा चालवायचा, हा प्रश्र त्यांना भेडसावत आहे.
काही दिवस बसून काढल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांकडे मिळेल त्या मजुरीत कांदा काढणी, ऊस लागवडीसारखी कामे सुरू केली आहेत. हे कामगार कायमच उपेक्षित राहिले आहेत. आपले बिऱ्हाड पाटीवर घेऊन वर्षात सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ भटकंती करणारा, ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता उसाच्या फडात राबूनही योग्य मजुरी नाही. राहण्याचे कायमस्वरूपी ठिकाण नाही. ना शिक्षण, ना आरोग्याची सोय, ना शासकीय योजनांचा आधार अन् हाती कोयता घेऊन तीन तीन पिढ्यांचा संघर्ष सुरुच आहे.