सातारा -करोना महामारीला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन सुरु असून किराणा माल, मेडिकल, भाजीपाला आणि दूध विक्री केंद्र वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. इतर सर्व दुकाने बंद असल्याने मोलमजुरी, रोजंदारी करणाऱ्या आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने आजपासून देशभरातील सर्व दुकाने काही बंधने घालून सुरु करण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे हॉटस्पॉट वगळता इतर ठिकाणची दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने आणि सातारा जिल्हा प्रशासनाने घ्यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. या लॉकडाऊनमध्ये गरजू लोकांना रोजीरोटी मिळण्यासाठी आणि रोडावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातही करोनाने हाहाकार उडाला असून करोनाला आळा घालण्यासाठी सुमारे महिनाभरापासून देशभरात लॉक डाऊन सुरु आहे.
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, छोटे- मोठे उद्योग आणि सर्व प्रकारची बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी सुरु असून करोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊन हा सर्वोत्तम पर्याय आहे. केंद्र सरकारने करोनाचे हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारची दुकाने काही नियम व अटी घालून सुरू करण्यास शनिवारी परवानगी दिली आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात आणि सातारा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात हॉटस्पॉट वगळून इतर सामान्य ठिकाणची दुकाने स्थानिक परिस्थिती पाहून सुरु करण्यास परवानगी दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली जाईल त्या ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर बंधनकारक करावा तसेच गर्दी होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग असे नियम व अटी घालूनच अशी दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. लॉकडाऊनमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला आहे.
असंख्य लोकांची रोजीरोटी बंद झाली आहे. तसेच बाजारपेठा, दुकाने बंद असल्याने अर्थव्यवस्थेला खीळ बसलेली आहे आणि याचा विपरीत परिणाम जनजीवनावर झाला आहे. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला चालना मिळून गोरगरिबांच्या रोजीरोटीसाठी दुकाने सुरु करण्याबाबत निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि घालून दिलेल्या अटी शर्थींचे बंधन घालून राज्य सरकार आणि सातारा जिल्हा प्रशासनाने हॉटस्पॉट वगळून इतर ठिकाणची दुकाने तेथील परिस्थिती पाहून सुरु करण्यास परवानगी द्यावी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलून जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीने निर्णय घेऊन ग्राहक व जनतेला दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केली आहे.