दिलीपराज चव्हाण
उंब्रज -याचा हा ग्रह या घरात आहे. त्याच्या तो ग्रह वक्री चालला आहे. मंगळ कडक आहे. शनी भारी आहे. गुण कमी जुळतात, या तारखेनंतर योग आहे. असे असंख्य प्रश्न व त्यावरील उपाय सांगून तसेच आता पत्रिका बळकट आहे. यंदा होणारचं म्हणून ज्यांच्या आशा पल्लवित केल्या अशा लग्नाळूंना मात्र, यंदा बाबा लगीन… बाबा लगीन.. म्हणण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांला सहजासहजी कुणी पोरी देत नव्हतं साध्या नोकरीपेक्षा सरकारी नोकरीवाला पाहिजे. परत तो पुण्या-मुंबईतला पाहिजे, सरकारी नोकरीवाला सगळ्यात चांगला, स्वतःचा प्लॅट असावा, गावाकडे घर जमीन असावी, अशा एक ना अनेक अटी असल्याने अनेकजण थटून होतेच. त्यात ह्यो करोना ऐन लगीन सराईच्या हंगामात आल्याने पत्रिकेत ज्यांचे सगळे ग्रह योग्य घरात होते ते सगळे घरात बसून आहेत. ज्यांना बाशिंग बाधायचे होते ते मास्क बांधून घरातच बसले. अंगाला हळद लावायची सोडून सॅनिटायझर लावायची वेळ आली आहे. आता घरातून बाहेर पडायचे मुश्कील झाले असून जर नशिबाने एखाद्याचे ठरलचं तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम व शर्थीचे पालन करत सावधपणे शुभमंगल सावधान करावे लागणार आहे.
लग्नाळू मंडळींनी जास्त चिंता करण्याचे कारण नाही. पावसाळ्यात मुहूर्त आहेत. आपलं व्हायचं असेल तर होईलचं. डिच्यांग… डिच्यांग… बाबा लगीन… बाबा लगीन… म्हणून घाई करण्यात अर्थ नाही. हे लक्षात घ्यायला पाहिजे. डिच्यांग…डिच्यांग… आत्ताच वाजणार नाही. शासनाने काही निर्बंध घातले असून पन्नासपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत. याकडे लक्ष दिले पाहिजे. मग, बॅंडबाजा बारात नाही, दरबार मिरवणूक नाही, मांडवात (हॉलवर) गर्दी नाही, वरात नाही, नाच नाही. सगळ कसं मोजूनमापून करावं लागणार आहे.
पळून जाऊन लग्नाचा विचार करणारे परश्या – अर्ची यांच्या भेटीत करोनामुळे दुरावा आला असून बाहेर बंदोबस्त जास्त असल्याने व वाहनांची सोय नसल्याने तेही शक्य नाही. पत्रिकेतील अडचणी सांगणारेच आज अडचणीत आले आहेत. “कही खुशी कही गम’ होणार असल्याचे दिसत आहे. ज्यांचे शुभकार्य आहे त्यांचे खर्च वाचणार हे जरी सत्य असलेतरी यावर अवलंबून अनेकांना याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकांना अर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार हे निश्चित झाले आहे!
============