जांबूत – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील बेट भागात पिंपरखेड, जांबूत, काठापुर खुर्द आदी परिसरात रविवार (दि. 7) सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील आठवड्यात याच भागात मोठा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अजून शेतकरी यातून सावरत असताना पुन्हा एकदा निसर्गाचे तांडव पाहावयास मिळाले.
जांबूत परिसरात अनेकांच्या घरात पाणी शिरून अन्नधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, झेंडू आदी पिकांसह चारा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मागील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत आहेत. त्यातच पुन्हा सकाळपासूनच प्रचंड उकाडा होता. उन्हाची तीव्रता तर कधी ढगांची दाटी असा ऊन- सावलीचा खेळ सुरू असतानाच दुपारी चारच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी दाटली. सोसाट्याच्या वारा वाहू लागताच मुसळधार पाऊस सुरू झाला. दोन तास मुसळधार पावसाने झोडपले. आठ दिवसांत दोनवेळा ओढ्या- नाल्यांना मोठा पूर आले आहे.
मागील दोन वर्षांच्या काळातील करोना महामारी आणि बेसुमार प्रमाणात वाढलेले खते, बियाण्यांचे दर आणि अवाजवी मजुरीमुळे बळीराजा अर्थिकदृष्ट्या हतबल होता. दोन वर्षांत कमी प्रमाणात उत्पन्नांची बेरीज झाली आहे. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असताना अशाप्रकारे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाताशी आलेल्या पिकांचे डोळ्यासमोर नुकसान झाले आहे.
महसूलच्या नशिबी पुन्हा पंचनामे
मागील आठवड्यात जांबूत परिसरात ढगफुटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला सूचना देऊन पंचनाम्यांची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात महसूल यंत्रणा गुंतली असताना पुन्हा महसूलच्या कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याची वेळ आली आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची मागणी जोर धरू लागली आहे.