नवी दिल्ली – कुपोषणाविरोधातील लढा आणि जलसंधारणाचे महत्व देशवासियांना पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडीओवरील आपल्या मासिक संवादाच्या कार्यक्रमातून देशवासियांना केले.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षात देशभरातून अमृत धारा वाहू लागली आहे. देशभरातील जनता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करत आहेत. लोकांनी आपल्या घरांवर तिरंगा फडकावून उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जुन सांगितले. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील योद्ध्यांच्या कार्याबद्दल माहिती घेण्यासाठी “स्वराज’ही मालिका बघण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
देशभरातून कुपोषण हद्दपार करण्यासाठी सरकारी पातळीवरून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहितीही पंतप्रधानांनी दिली. तसेच कुपोषणाविरोधी जनजागृतीमध्ये देशवासियांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. कुपोषणाविरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये देशभरातील मृत जलसाठे पुन्हा सजीव करण्यात आले. याद्वारे जलसंधारणाला गती मिळाली आहे. नाल्यांची स्वच्छता करण्यात आली आणि जलमार्ग खुले करण्यात आले. हे जलसाठे जनावरांची तहान भागवत असल्याचे ते म्हणाले.
2023 हे वर्ष तृणधान्यांचे आतंरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मान्य केला आहे.
या तृणधान्यांच्या माध्यमातून होणाऱ्या पोषणाचा पंतप्रधानांनी गौरवाने उल्लेख केला. देशात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना या तृणधान्यांपासून बनवलेले पदार्थ आवडले आहेत. या धान्यांच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक नपाही मिळतो. तसेच त्यापासून जनावरांना चाराही मिळू शकत असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
या स्वातंत्र्यदिनापासून अरुणाचल प्रदेशातील जोरसिंग या दुर्गम गावात 4 जी कनेक्टिव्हिटी सुरू झाली. ज्या सुविधा आतापर्यंत केवळ शहरांपुरत्या मर्यादित होत्या त्या डिजीटल इंडियाच्या माध्यमातून गावपातळीवरही उपलब्ध होत आहेत. कनेक्टिव्हीटीमुळे व्यापार आणि उद्योगालाही चालना मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Through “Mann Ki Baat”, Pantpradhan interacted with the countrymen; focused on these issues)