कामगार नेते इरफान सय्यद यांच्या मागणीची राज्य शासनाकडून दखल
पिंपरी – राज्य माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने करोनाच्या कालावधीत नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांना पाच हजारांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार तीन हजार रुपयांचा पहिला हप्ता माथाडी कामगारांच्या खात्यात जमा केला आहे. त्यासाठी शिवसेनाप्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी याबाबतची मागणी केली होती.
माथाडी मंडळाच्या राखीव निधीतून नोंदणीकृत माथाडी कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा सूचना शासनाच्या कामगार विभागाने केल्या होत्या. मात्र पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील माथाडी कामगार या लाभापासून वंचित होते. कामगार नेते इरफान सय्यद यांनी राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
याबाबत बोलताना इरफान सय्यद म्हणाले, “”माथाडी कामगारांना अर्थसहाय्य मिळण्यासाठी कामगार विभागाने राज्यातील माथाडी मंडळांना प्रशासकीय किंवा राखीव निधीमधून अर्थसहाय्य देण्याबाबत सूचना केल्या होत्या. अखेर राज्य शासनाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील कामगारांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे.”
यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, जनरल सेक्रेटरी प्रवीण जाधव, किसन बावकर, सेक्रेटरी भिवाजी वाटेकर, मुरलीधर कदम, खंडू गवळी, उपाध्यक्ष ज्ञानोबा मुजूमले, सेक्रेटरी पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.