नाशिक – नाशिक येथे तीन जणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. यात एका बारा वर्षांच्या मुलासह तीन जणांचा समावेश आहे. पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तमनगर येथील महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते.
या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला.
दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला.
तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत राहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर आंघोळीला आला होता. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.