रिकाम्या बाटल्या आणि चकण्यावरून वाद
पुणे(प्रतिनिधी) – येरवडा परिसरात रविवारी झालेल्या खूनप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली. हा खून दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि चकण्याचा कचरा कुठे टाकायचा यावरून झाल्याचे तपासातून निष्पन्न झाले. दयानंद अशोक साळवे (34), उमर शरफुद्दीन पानसरे (43), आकाश अंकुश गायकवाड (45,सर्व रा. रामवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फैय्याज कादर शेख (27, रा. रामवाडी) असे मृताचे नाव आहे.
यातील अतूल शेळके हा खाद्यपदार्थाच्या मोकळ्या पुड्या आणि बाटल्या आगरवाल यांच्या बंद असलेल्या बांधकामाच्या पहिल्या मजल्यावर टाकत होता. यावेळी दयानंद अशोक साळवे याने त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यांच्या भांडणामध्ये अतूल शेळके याचा मित्र फैय्याज याने दयानंद साळवे याला मारहाण केली होती. ही घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासांतच आरोपींनी फैय्याजला दगडाने आणि प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.
दारु पिण्यासाठी नेहमी एकत्र बसत…
आरोपी आणि मित्र एकमेकांच्या परिचयाचे आहेत. ते दारु पिण्यासाठी नेहमी एकत्र बसत होते. घटने दिवशीही ते एकत्र दारु पिण्यासाठी बसले होते. यावेळी यातील एकाने रिकाम्या दारूच्या बाटल्या, चकण्याची रिकामी पाकीटे घरी घेऊन जा, असे म्हणाला होता. यावर यातील एकजण इतक्या दिवस काय आपण कचरा घरी घेऊन जात होतो का? असे म्हणाला. यावरून त्यांच्यात वाद होऊन प्रकरण खुनापर्यंत गेले.