जयपूर – भाजपकडे ईडी असली तरी आमच्याकडे मतदारांसाठीची गॅरंटी आहे, त्या आधारावर आम्ही राजस्थानातील निवडणुका जिंकू, या निवडणुकीतील अंडरकरंट कॉंग्रेसच्याच बाजूने आहे असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात आज ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, भाजप राजकीय फायद्यासाठी अंमलबजावणी संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाचा गैरवापर सुरू केला आहे आणि ही बाब राज्यातील जनतेलाही समजली आहे, त्यामुळे ते या प्रकाराला सडेतोड उत्तर देतील. भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांच्या सुचेनुसार ईडी आणि आयकर खाते राजस्थानात एक वर्षभर कार्यरत होते असा आरोपही त्यांनी केला. किरोडीलाल हे केंद्रीय यंत्रणांकडे खोट्या तक्रारी करीत होत असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसने या निवडणुकीत मतदारांना सात हमी दिल्या आहेत. या सात हमींमध्ये महिला कुटुंबप्रमुखांना वार्षिक 10000 रुपये मानधन, 1.5 कोटी कुटुंबांना पाचशे रूपयांत एलपीजी सिलिंडर, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शन योजनेचा कायदा, सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा टॅबलेट, अशा हमींचा समावेश आहे. ते म्हणाले की, भाजपने त्यांच्या निवडणूक प्रचारात हमीभावाबाबत बोलावे.