पाटणा – लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी नितीशकुमार यांचे नेतृत्व मान्य नसल्याचे वक्तव्य केले. मात्र त्याचबरोबर आपण एनडीए सोबत असल्याचीही पुष्टी जोडली होती. मात्र आता भाजपानेच पलटवार केल्याची चर्चा आहे. जे नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत त्यांना एनडीएमध्ये स्थान दिले जाणार नाही, असे भाजपाकडून सांगितले गेले असल्याची चर्चा आहे.
याबाबत बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल म्हणाले, ‘बिहारमध्ये एडीएचे नेते नितीशकुमार आहेत आणि बिहारची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली जात आहे. नितीशकुमार यांचे नेतृत्व बिहार भाजपला पूर्ण मान्य आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘एनडीएमधील सर्व घटकपक्षांना नितीशकुमार यांचे नेतृत्व स्वीकारावेच लागेल.’
नितीशकुमार यांच्या जेडीयू पक्षाचे उमेदारांविरुद्ध निवडणूक लढवणार मात्र भाजप उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे करणार नाहीत अशी चिराग यांची भूमिका आहे. चर्चा अशीही आहे की, भाजपानेच चिराग यांना नितीशकुमार विरुद्ध भूमिका घेण्याची फूस लावली आहे.
मात्र प्रदेशाध्यक्ष यांच्या आताच्या वक्तव्यानुसार बिहार राजकारणाला आणि एकूणच विधानसभा निवडणुकीला वेगळे वळण लागणार आहे, असे दिसते.