मुंबई : ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.त्यातच सर्वात चर्चेत असणारा सध्याचा आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला असून फडणवीसांनी देखील मलिक यांच्याबद्दलचे काही पुरावे आपण दिवाळीनंतर देणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, फडणवीसांच्या या आरोपावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना टोला लगावला आहे.
“बॉम्ब लगेच फुटले पाहिजेत. नाहीतर ज्याच्या हातात आहेत बॉम्ब त्यांच्या हातातच ते फुटतात. त्यामुळे हातात बॉम्ब वगैरे असतील तर ते डिस्पोज करा. कोणाकडे बॉम्ब असेल असं राजकीय नेते सांगत असतील तर ते स्वत:च्या जीवाशी खेळतायत,” अशी प्रतिक्रिया राऊत यांनी या राजकीय बॉम्बबद्दल बोलताना दिली.
तसेच “ताबडतोब त्यांनी एक तर बॉम्ब फेकला पाहिजे किंवा तो संपवला पाहिजे. देवेंद्रजींच्या हातात काही बॉम्ब असेल तर त्यांनी फोडावा ना दिवाळी संपायची कशाला वाट पहायची,” असे यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना राऊत म्हणाले आहेत.
फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा दावा केला आहे त्यावरही राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत उत्तर दिले आहे. “या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राजकीय नेत्याचे अंडरवर्ल्डशीसंबंध नाही. मी भाजपामधले १० पदाधिकारी देऊ शकतो. जे तुरुंगांमधून शिक्षा भोगून बाहेर आहेत आणि आज पक्षाचे पदाधिकारी आहेत. कोल्हापूरातून कोणं आलं आहे, चेंबूरमधून कोण आलंय. कोण कोणत्या गँग चालवत होते हे मी द्यायचं ठरवलं तर माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस नाही यामध्ये,” असे राऊत म्हणाले आहेत.