मुंबई – भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होईल, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. आता या चर्चेत आणखी एक आध्याय जोडला गेला असून आयोध्येतील साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं. त्यातच आता साध्वी कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांवर प्रेम असल्याचं नमूद केलं.
कांचनगिरी म्हणाल्या की, राज यांच्यासोबत उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचं सांगितलं. “राज ठाकरे यांच्या मनात उत्तर भारतीयांबाबत अजिबात द्वेषभावना नाही हे मला त्यांच्यासोबतच्या चर्चेत जाणवलं. उत्तर भारतीयांवर राज ठाकरेंचं प्रेम आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशातून मुंबई आलेल्यांनी निश्चिंत राहावं कारण राज ठाकरे यांचं उत्तर भारतीयांवर प्रेम आहे, असं साध्वी कांचनगिरी म्हणाल्या.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं”, असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी राजकाराणाबाबत आपल्याला काही माहित नसून आपण साध्वी असल्याचं म्हटलं.