मुंबई – महाराष्ट्रावर ओढवलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कंबर कसली असून कोरोनाला अटकाव करण्यासाठी आज सरकारतर्फे आणखी एक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा संसर्ग असलेल्या देशांमधून भारतामध्ये येणाऱ्यांची विमानतळावर चाचणी करण्यात येते. या चाचणीचे निकाल येईपर्यंत अशा प्रवाशांना त्यांच्याच घरामध्ये विलगता बाळगण्याचे आदेश देण्यात येतात. मात्र काही प्रवासी हा आदेश मोडून जनतेत मिसळतात त्यामुळे साथीचा प्रसार होऊ शकतो. हे टाळण्यासाठी व अशा प्रवाशांची ओळख सहजासहजी पटावी यासाठी सरकारने आता त्यांच्या डाव्या हातावर एक विशिष्ट प्रकारचा शिक्का मारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून या बैठकीस राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडीओ-कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली होती.