मंचर, (प्रतिनिधी) – जुन्नर तालुक्यातील नारायणगड, वडगाव कांदळी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, कांदळी, येडगाव आणि आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे, काठापूर या गावांतील आदिवासी शेतकऱ्यांचे वनविभागाने बेकायदा काढलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात बळीराजाने शनिवार (दि. 16) पासून मंचर (ता.आंबेगाव) प्रांतकार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने लवकर कार्यवाही न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
वंचित प्रणित एकलव्य आघाडीच्या पुढाकाराने नारायणगड, कांदळी, नगदवाडी ते मंचर उपविभाग कार्यालयापर्यंत पायी लॉग मार्च काढून गुरुवारी (दि. १४) मंचर कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारपासून उपोषण सुरू करण्यात आले. या आदिवासी शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण राहणार आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता बळाचा वापर करुन आदिवासींची घरे, जमीन, शेतीतील पिके व पिण्याच्या पाण्याची विहीर बेकायदेशीरपणे बुजून टाकून आदिवासी शेतकऱ्यांना बेघर करणाऱ्या वनविभागातील अधिकारी व पोलीस संरक्षण देणारे पोलीस अधिका-यांची उच्चस्तरीय चौकशी करावी व संबंधित अधिका-यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन बडतर्फ करावे.
आम्ही कसत असलेल्या नारायणगाव, वडगाव कांदळी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, कांदळी, वेडगाव व आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे, काठापूर या गावांतील आदिवासी शेतकरी यांचे अतिक्रमण हे बेकायदा काढले आहे. ही कारवाई मान्य नसल्यामुळे वनविभागाने आम्ही राहत असलेली घरे उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे आम्ही बेघर झालो आहेत, असा आरोप बळीराजाने केला आहे.
वनसमित्या बरखास्त करा
ज्या ठिकाणी आमची घरे होती. त्याच ठिकाणी आमची घरे सरकारी योजनेतून बांधून देण्यात यावी. आम्ही कसत असलेल्या वहिवाट जागेतच राहून नारायणगड, वडगाव कांदळी, खोडद, हिवरे तर्फे नारायणगाव, कांदळी, येडगाव व आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे, काठापूर या गावातील आदिवासी शेतकऱ्यांचे पुन्हा दावे दाखल करून घ्यावेत व या गावातील असणाऱ्या वन समित्या बरखास्त करून या समितीमध्ये आदिवासी शेतकरी अध्यक्ष व सदस्य असले पाहिजे.
आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या शेतीमालाचे अतिक्रमण काढताना वन विभागाकडून १०० टक्के पिकांचे नुकसान करण्यात आले आहे. त्यामुळे या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित द्यावी व जेसीबीच्या सहाय्याने खोदलेल्या चरांचे सपाटीकरण करून शेती योग्य जमीन करून द्यावी. -अनिल जाधव, अध्यक्ष, एकलव्य आघाडी, महाराष्ट्र राज्य