पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करत भाजपने आघाडी घेतली असली, तरी राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेसचा दावा असलेल्या या जागेवर अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
त्यातच काँग्रेसकडूनही तिकिटासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची रांग असल्याने, तसेच निवडणूक अर्ज भरण्यासाठी जवळपास महिनाभराचा अवधी असल्याने काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
शहर पातळीवरील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याने गेल्या काही वर्षांतील निवडणुकांमध्ये पक्षाला याचा फटका बसला असून, वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार पुण्यातील नेत्यांनी आपापसांतील मतभेद आधी मिटवावेत, मग उमेदवारीवर चर्चा करू, असे थेट सुनावले आहे.
त्यातच महाविकास आघाडीचे राज्यातील जागा वाटपांचे त्रांगडे सुटत नसल्याने आघाडीच्या उमेदवारांची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. त्यातच आता राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होणार असून, पुणे लोकसभा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाकडून २०१९ प्रमाणे यंदाही उमेदवार उशिराच जाहीर केला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आघाडीतील नेते गोंधळात
काँग्रेसच्या तिकिटांवर इच्छुक असलेल्या शहरातील चार ते पाच नेत्यांकडून पुण्याच्या जागेवर दावा करण्यात आला आहे, तसेच एकमेकांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली जात असून, नेत्यांकडून मुंबईवारी सुरू करण्यात आली आहे. तर काँग्रेससोबत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्यांची भेट घेऊन आपलीच उमेदवारी निश्चित असून, मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.
त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरत नसल्याने या नेत्यांचाही गोंधळ उडाला आहे. या दोन्ही पक्षांकडून शहरात कार्यकर्ता मेळावे, तसेच बैठका घेतल्या जात असल्या, तरी या बैठकांमध्ये पक्षाचा नेमका उमेदवार कोण, हे सांगता येत नसल्याने घटकपक्षांची कोंडी झाली आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवातही केली आहे. असे असताना पुण्यात मात्र काँग्रेस उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासाठी चाचपडत असल्याचेच चित्र आहे