अतिवृष्टीमुळे कांदा रोपे झाली नष्ट : जिल्ह्यात जाणवतेय टंचाई
दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल
भरमसाठ पैसे देऊन रोपे विकत घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ
रांजणी (वार्ताहर) – यंदा सर्वत्रच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाने यंदा कांदा उत्पादनाला देखील मोठा फटका बसला आहे. त्याला कारणही तसेच आहे. कांदा लागवडीसाठी तयार करण्यात आलेली कांदा पिकाची रोपे अतिवृष्टीमुळे पुर्णत: नष्ट झाली आहेत. त्यामुळे कांदा रोपाच्या टंचाईमुळे जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्रात घट होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून वर्तविली जात आहे.
यंदा खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.किमान रब्बी हंगामात तरी चांगली पिके येतील अशी शेतकऱ्यांना आशा होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील कांद्याची पिके घेण्यासाठी शेतात कांद्याची रोपे तयार केली. परंतू अवकाळी पावसाने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्याची परिस्थिती पाहिली तर कांदा लागवड करण्यासाठी कांद्याची रोपेच उपलब्ध नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यान यंदा परतीच्या पावसामुळे ऊस पिकाचेही अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उसाची पिके नष्ट करुन शेतकऱ्यांनी उसाच्या शेतात कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कांद्याची रोपेच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवड करण्याचा निर्णय देखील फसला आहे. अशा परिस्थितीत शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हा शेतकऱ्यांपुढील महत्वाचा प्रश्न आहे. कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचा कल उन्हाळी कांद्याच्या लागवडीकडे वाढला आहे. परंतु लागवडीसाठी कांदारोपे आणायची कोठून हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा आहे.
लागवडीबरोबर उत्पादनाचा खर्च देखील वाढणार
चालू वर्षी कांदा लागवड करताना शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा खर्च देखील वाढणार आहे. चालू वर्षी 5 एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली, तर साधारणत: एक ते दीड लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपे वाढीच्या अवस्थेतच पाऊस पडल्याने कांद्याची रोपे पूर्णत: सडून गेली. त्यामुळे शेतात कांदा लागवड करायची असेल तर कांद्याची रोपे विकत आणि तेही भरमसाठ पैसे देऊन आणल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. डिसेंबरमध्ये कांद्याची लागवड झाली तरच उत्पादन चांगले मिळते. परंतु रब्बी हंगामातील कांद्याचा हंगाम हातून निघून गेला आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी संदेश थोरात यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड या तालुक्यांमध्ये उन्हाळी कांद्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतात कांदा रोपांचे नियोजन केले होते. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा रोपाच्या रोपवाटीका तयार केल्या होत्या. सध्याच्या कांदा लागवडीचे चित्र पाहिले तर शेतकऱ्यांना भरमसाठ पैसे खर्च करुन कांद्याची रोपे कांदा लागवडीसाठी खरेदी करावी लागत आहेत. परंतु हा खर्च निश्चितच शेतकऱ्यांना परवडणारा नाही.
-प्रविण थोरात, पाटील,गतीशिल शेतकरी.