पेठ परिसरात आलेल्या कदमांकडून लोककला जोपासण्याचा प्रयत्न
पेठ (वार्ताहर) – महाराष्ट्राला लोककला आणि लोकसंस्कृतीचा वारसा आहे. मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये अनेक परंपरा आणि संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. लोककला माहित असणारी मोजकीच मंडळी आता शिल्लक आहेत. या लोककला, लोकसंस्कृती काळाच्या ओघात नष्ट होऊ नये, म्हणून आपल्या कुटुंबातील लोकांनी 100 वर्षे भुत्याबाबाची पंरपरा पुढे चालविली ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न तुळजापूरहून पेठ (ता. आंबेगाव) परिसरात आलेले भुत्याबाबा सुरेश गणपतराव कदम आणि त्यांचा भाचा ही लोककला जोपासताना दिसत आहेत.
गेली 100 वर्षांपासून कदम यांच्या कुटुंबामध्ये ही लोककला जोपासली जात आहे. हे भुत्याबाबा तुळजापूर जवळील कदमाचीवाडी येथून आलेले असून पेठमध्ये महिनाभर त्यांचा मुक्काम दत्तात्रय क्षीरसागर यांच्या घरी असतो. हे बाबा प्रामुख्याने घटस्थापनेनंतर येतात. यांच्याकडे वरूडे, वाफगाव, पेठ, गुळाणी, जऊळके, पारगाव आदी ठिकाणी ते लोककला सादर करतात. भुत्या हा देवीचा भक्त असून छातीवर देवीचा भला मोठा टाक, हातात पेटता पोत असा पेहराव घालून हा भुत्याबाबा देवीची गाणी गात, नाचत असतो, अशी आख्यायिका असून त्याचपद्धतीने कदम गात आहेत.
घरोघरी फिरून करताहेत उदरनिर्वाह
पेठ परिसरात पारंपरिक वेशात सकाळी व सायंकाळी भुत्याबाबा घरोघरी फिरत असताना दिसत आहे. घरोघरी फिरुन धान्य, दक्षिणा घेत आपला उदरनिर्वाह करत आहेत. 25 वर्षांपूर्वी जी लोकांमध्ये धार्मिकता होती, ती दिवसेंदिवस कमी झाल्याची खंत यावेळी तुळजापूर येथील भुत्याबाबा सुरेश गणत कदम यांनी व्यक्त केली.
अध्यात्मामुळे नागरिकांचा प्रतिसाद झाला कमी-अलिकडे नागरिकांचा कल अध्यात्मावरून कमी झाला आहे. 25 वर्षापूर्वी मिळणारा प्रतिसाद आता मिळताना दिसत नाही. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या महिलांचा प्रतिसाद जवळजवळ मिळत नसल्यामुळे मी पारंपरिक बैठी घरे, चाळ यांमध्येच मी ही कला सादर करतो.
– सुरेश कदम, भुत्याबाबा