चिखली – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, माजी नगरसेवक यांनी यंदा वटपौर्णिमेच्या आयोजनाकडे पाठ फिरवली आहे. मागील वर्षी निवडणुकांचे वारे वाहत होते. जनतेच्या मनात घर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलांच्या सोयीसाठी चौकात, सोसायटींमध्ये तसेच मंदिरांसमोर वटवृक्ष ठेवले होते. बॅनरबाजी करून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु यंदा मात्र याला फाटा देण्यात आला आहे.
निवडणुका जवळ आल्या किंवा तसे वारे वाहू लागले की शहरातील, गल्लीबोळातील, प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आजी माजी लोकसेवक नागरिकांच्या मनात स्थान मिळविण्यासाठी जनतेला जनार्दन मानून सेवा देत असतात. परंतु निवडणुकीची चिन्हे दिसत नसल्यास मात्र वाट बदलतात. अनेक जनसेवक तर आज दिसले सुद्धा नसल्याने राजकारण आणि राजकीय मंडळीच्या वर्तनाचा प्रत्यय वटपौर्णिमेच्या निमित्ताने आला.
शनिवारी (दि. 3) हिंदू संस्कृतीमधील महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा वटपौर्णिमा सण होता. या सणानिमित्त सुहासिनी महिला आपल्या पतीला दीर्घ व निरोगी आयुष्य मिळावे अशी प्रार्थना करतात. तसेच पुढील सात जन्म आमची जोडी टिकून राहवी अशी वटवृक्षाची पूजा करून प्रार्थना करतात. शहरात काही भागात मोठ्या प्रमाणावर वटवृक्ष आहेत. परंतु काही भागात सोसायट्या वाढल्याने वृक्षांची संख्या घटली आहे. काही परिसरात तर एकच वटवृक्ष असल्याने महिला मंडळींची मोठी गर्दी झाली होती.
लोकसेवकांनी घेतला आखडता हात
सध्या धकाधकीचे जीवन आहे. बहुतांश घरांतील महिला कामावर, नोकरीला अथवा छोटा मोठा उद्योगधंदा करत आहेत. त्यांना वटपौर्णिमा साजरी करून वेळेत कामावर पोहचता यावे, एकाच ठिकाणी जास्त गर्दी होऊन अनुचित प्रकार घडू नये ही भावना ठेवून मागील वर्षी बऱ्याच आजी माजी लोकसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या ठिकाणी वटवृक्षांची व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी बॅनरबाजी करून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता. परंतु यंदा निवडणुका कधी होणार हे अजून कळत नाही. मागील दोन वर्षांपासून मतदार राजांवर खर्च सुरू आहे. त्यामुळे घर जाळून कोळशाचा धंदा कुठपर्यंत करायचा, असा सवाल करत शहरातील बहुतांश राजकीय मंडळी आणि त्यांच्या संघटनांनी वृटपौर्णिमेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.