मांडवगण फराटा – उष्णतेच्या झळांनी पिकांची अवस्था केविलवाणी झाली असून, विजेच्या अतिरिक्त भारनियमनाचाही फटका या पिकांना बसत आहे. पाणी असूनही भारनियमनामुळे पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतातील पिकांची होरपळ होण्यापूर्वी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
शिरसगाव काटा, आलेगाव पागा, मांडवगण फराटा, न्हावरे येथील वीज उपकेंद्रांना शिरूर तालुक्यातील कुरुळी वीज केंद्रातून वीजपुरवठा होतो. काही दिवसांपासून विजेची मागणी वाढल्याने महावितरणकडून अतिरिक्त भारनियमन केले जात आहे. सध्या कडक उन्हाळ्यात पिकांची अवस्था बिकट असून, पाणी दिल्यानंतरही पिके कोमेजू लागली आहेत. अशा अवस्थेत शेतीपंपांना दिवसातून दोन तीन तास वीजपुरवठा होत आहे. त्यात विजेच्या तांत्रिक अडचणी, लपंडावामुळे पिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे.
परिणामी, चारा पिके, ऊस, मका, मल्चिंगचा वापर करून घेतलेल्या टोमॅटो, कलिंगड, मिरची या पिकांची अवस्था केविलवाणी झाली आहे. विजेबाबत कल्पना नसल्याचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. अस्मानी संकटाशी दोन हात करून पिकवलेल्या शेतमालाला बाजारभावही मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त झाला आहे. उभ्या संकटांना तोंड देता देता बळीराजा अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे. पिके करपून गेल्यावर वीजपुरवठा सुरळीत करणार का, असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.
शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद
एकीकडे शेतकरी दिवसा विजेची मागणी करत असताना विजेच्या संकटाने ऐन उन्हाळ्यात बळीराजाच्या समस्या तीव्र केल्या आहेत. पाणीटंचाईने उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक संकट गडद होणार आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी अजूनही पाणीटंचाई जाणवत नसून पाणी असूनही वीजपुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे.