मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे. भाजपने महामारीत एकत्र काम करावं. फडणवीस यांना राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवली, असे वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करुन दाखवाव. असे पेडणेकर म्हणाल्या.
“मी तूर डाळीचा घोटाळा ऐकला होता, पण कोरोना मृतांचा घोटाळा पहिल्यांदाच ऐकत आहे खरंतर मृत बॉडी लपून राहूच शकत नाही. ती तातडीने डिस्पोज करावी लागते. ज्यांना राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवल्याचे वाटत असेल त्यांनी सिद्ध करुन दाखवावं. हे मयताच्या कपाळावरचं लोणी खाण्याचं काम आहे”असे खडेबोल पेडणेकर यांनी फडणवीसांना सुनावले.
कोरोना हा गंभीर आजार आहे. यादरम्यान राजकारण करु नका. महाराष्ट्रात सध्या खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खरे की खोटे? हे जनता ठरवेल,अशी किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू लपवल्याचा राज्यसरकारवर आरोप केला होता. इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला होता.