जामखेड – जनतेच्या जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार व शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राज्यातील हे सरकार महाभकास’ आघाडी सरकार आहे, असा आरोप माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला.
महाविकास आघाडीच्या विरोधात जामखेड भाजपतर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रा. शिंदे बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष अजय काशिद, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, अनिल लोखंडे, पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, डॉ. भगवान मुरूमकर, रवि सुरवसे, मनोज कुलकर्णी, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सुधीर राळेभात, करण ढावळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रविण सानप, नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरसेवक महेश निमोणकर, सोमनाथ राळेभात, बिभीषण धनवडे, अमित चिंतामणी, अमजद पठाण, सलिम बागवान, मकरंद काशिद, सुभाष जायभाय, विलास मोरे, खर्डाचे सरपंच संजय गोपाळघरे, पोपट राळेभात, गणेश लटके आदींसह शेतकरी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, अवकाळीग्रस्तांना प्रतिहेक्टर 25 हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर 50 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. पण सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही. सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक करणारी आहे. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी महाआघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गूल आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. यावेळी डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, आदींची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे याना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.