पाईट -खेड तालुक्यच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने यंदा फेब्रुवारी संपत आला तरी पाण्याची कोठीही टंचाई जाणवलेली नाही की चाहुलही लागलेली नाही. दरम्यान, अतिपाऊसामुळे खरीप पीके सडून गेली तर रब्बी हंगामात सुरुवातीला झालेला पाऊस आणि वातावरणात वेळोवेळी होणारे बदल यामुळे वाटाणा, मसूर, हरभरा, मटकी आदी तृणधान्यावर किडींनी थैमान घातले असल्याने शेतकऱ्यांनी अनेक फवारण्या करूनही किडींचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कडधान्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
वातावरणातील विषमतेमुळे रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीवर नियंत्रण ठेऊन पिकांची निघा राखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारण्या कराव्या लागत आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडून जाणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला असला तरी पिके ऐन फुलोऱ्यात आली असताना वरुणराजाने जोर वाढवल्याने फुलोरा गळून गेल्याने काबाडकष्ट करून पिकवलेल्या शेतीत निमपटीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने हताश असलेला बळीराजा रब्बी हंगामातील पिकांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत होता; परंतु सततचे धुके आणि कडाक्याची थंडी यामुळे शेतकऱ्यांच्या या अपेक्षाही कवडीमोल झाल्याने आता कसे जगावे या काळजीने ग्रासला आहे.
तृणधण्याबरोबरच जनावरांना खाण्यासाठी मका, ज्वारी पिकाचे उत्पादन शेतकरी याच रब्बी हंगामात घेत असल्याने याही पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामुळे जनावरांच्या खाद्याचा तुटवडा निर्माण होऊन भाव वाढणार आहेत. त्यातच मशागत, बियाणे, खते, औषधे यांचा भार शेतकऱ्यांवर पडला असल्याने अगोदरच ओझ्याने वाकलेल्या शेतकऱ्यांवर भुईसपाट होण्याची वेळ आली आहे.
शासनाने या पिकांची पाहणी करून खरीप व रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या संदर्भात मा तहसीलदार यांना सर्व ग्रामपंचायतींच्या वतीने निवेदन देणार आहोत.
– बारकू आवळे, सरपंच, कोळीये