आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना पत्र
उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी
पिंपरी : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने शहरातील दारिद्रय रेषेखालील नागरिकांसह मागासवर्गीय व अल्पसंख्यांकासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या “एनयुएलएम’ योजनेमध्ये कोट्यवधी रुपयांचा अनागोंदी कारभार झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी व दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून अदा केलेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याबाबतचे वृत्त दैनिक “प्रभात’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 26 महापालिकांमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबविले जात आहे. या अभियानासाठी केंद्र शासनाकडून साठ टक्के तर राज्य शासनाकडून 40 टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात राहणाऱ्या एससी, एसटी, अल्पसंख्यांक व दारिद्रय रेषेखालील नागरिकांना या योजनेद्वारे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रति लाभार्थी 15 हजार रुपये शुल्क केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी संस्थेला दिले जाते. गेल्या दोन-तीन वर्षांत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.