नवी दिल्ली – यंदा विद्यापिठे आणि उच्च शिक्षणासाठीच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जुलैऐवजी सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे. देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विद्यापिठ अनुदान आयोग अर्थात “युजीसी’ने नियुक्त केलेल्या समितीने ही शिफारस केली आहे.
यंदा लॉकडाऊनमुळे झालेले शैक्षणिक वर्षाचे नुकसान आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांशी संबंधित शक्यतांबाबत विचार विमर्श करण्यासाठी “युजीसी’ने दोन समित्या नियुक्त केल्या होत्या. त्यातील एका समितीने शैक्षणिक वर्षाची सुरुवात जुलैऐवजी सप्टेंबरपासून करण्याची शिफारस केली आहे. तर दुसऱ्या समितीने विद्यापिठांनी ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात अशी शिफारस केली आहे. जर विद्यापिठांकडे ऑनलाईन परीक्षांसाठीची सुविधा नसेल तर लेखी परीक्षेसाठी लॉकडाऊन उठण्याची वाट बघावी लागेल, असेही या समितीने म्हटले आहे.
“नीट’ आणि “जेईई’सारख्या प्रवेश परीक्षा जूनमध्ये घेतल्या जाव्यात. अर्थात तेंव्हा करोनाची स्थिती काय असेल, त्यावर हे अवलंबून असेल, असेही या समितीने सुचवले आहे.