पाथर्डी – पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. पुन्हा एकदा सभासदांनी कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांच्यावर विश्वास टाकला आहे. वृद्धेश्वरच्या रूपाने जिल्ह्यातील तिसरा साखर कारखाना बिनविरोध झाला आहे.
कारखाना निवडणुकीसाठी 7 जानेवारी ते 13 जानेवारीपर्यंत 104 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेमध्ये विविध कारणास्तव 30 उमेदवारी अर्ज अवैध ठरले होते. तसेच 74 अर्जांपैकी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 55 जणांनी अर्ज माघारी घेतल्याने 19 जागांसाठी 19 उमेदवारी अर्ज राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी जाहीर केले. या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते.
9 जानेवारी रोजी कारखाना निवडणूक संदर्भात कारखान्याचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे यांनी सभासद शेतकर्यांचा पाथर्डी येथे मेळावा घेतला होता. या मेळाव्यात शेतकर्यांनी निवडणुकीचे सर्वाधिकार अप्पासाहेब राजळे यांना देवून निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला होता. या आवाहनाला प्रतिसाद देत ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत अप्पासाहेब राजळे यांनी भौगलिक समतोल राखत व नव्या-जुन्याचा मेळ घालत अनेक नव्या चेहर्यांनाही संधी दिली.
बिनविरोध निवडून आलेले संचालक गटनिहाय पुढीलप्रमाणे कासार पिंपळगाव गट – अप्पासाहेब राजळे, उद्धवराव वाघ, चितळी गट- अनिल फलके, सुभाष ताठे, साहेबराव सातपुते, कोरडगाव गट- श्रीकांत मिसाळ, बाबासाहेब किलबिले, पाथर्डी गट- रामकिसन काकडे, सुभाष बुधवंत, मिरी गट- शरद अकोलकर, डॉ. यशवंत गवळी, टाकळी मानूर गट- बाळासाहेब गोल्हार, शेषराव ढाकणे, तर सहकारी संस्था प्रतिनिधी- राहुल राजळे, अनु.जाती जमाती- काकासाहेब शिंदे, महिला प्रतिनिधी- आमदार मोनिका राजळे, सिंधूबाई जायभाये, इतर मागास प्रवर्ग- कुशिनाथ बर्डे, भटक्या विमुक्त जाती, जमाती- कोंडीराम नरोटे.
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेवून सहकार्य केले, त्या सर्वांचे कारखान्याचे अध्यक्ष अप्पासाहेब राजळे व आमदार मोनिकाताई राजळे यांनी आभार मानले. विशेष करुन उमेदवारी अर्ज मागे घेणार्या प्रमुख सभासदांत अर्जुनराव राजळे, अॅड. विष्णू भोरडे, अमोल वाघ, रामकिसन शिरसाट, राम कचरे, शंकर भिसे, सुनील काजळे, रेवनाथ वाबळे, नागेश्वर कांबळे, कडूबाई कांबळे यांचा समावेश होता.
नवीन चेहर्यांना दिली संधी-
नवीन चेहर्यांमध्ये साकेगावचे साहेबराव सातपुते, मिरी- डॉ. यशवंत गवळी, हनुमान टाकळी – कुशिनाथ बर्डे, जवळवाडी – बाळासाहेब गोल्हार, पाथर्डी -काकासाहेब शिंदे, चुंभळी – शेषराव ढाकणे यांच्यासह स्वत: आमदार मोनिकाताई राजळे व राहुल राजळे हे प्रत्यक्ष निवडणुकीतून संचालक मंडळात जात आहेत.