चरेगाव (प्रतिनिधी) – कळंत्रेवाडी (ता. कराड) येथील गेल्या पंधरवड्यात एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊस पीक चोरीची घटना अद्याप ताजी असतानाच येथील शेतकरी दत्तात्रेय शंकर थोरात यांच्या अंगणात ठेवलेल्या जवळपास पाच क्विंटल सोयाबीनच्या ढिगातून एक क्विंटल सोयाबीनवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना पहाटे चारच्या सुमारास घडली.
चोरी गेलेल्या सोयाबीनची चालू बाजार भावानुसार जवळपास साडेसहा हजार रुपये किंमत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, पाटण- पंढरपूर राज्यमार्गालगतच अंदाजे 100 मीटर अंतरावर असलेल्या बंगल्यामध्ये थोरात आपल्या पत्नीसह राहतात.
दत्तात्रय थोरात मध्यरात्री दोन वाजेपर्यंत टीव्ही पहात जागे होते. ठीक दोन वाजता त्यांचा डोळा लागला. दरम्यान,अंगणात ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगातून एक क्विंटल सोयाबीन गायब झाल्याचे दुपारी थोरात यांच्या निदर्शनास आले. यामुळे मध्यरात्री दोन ते पहाटे पाचच्या दरम्यान चोरी झाल्याची शक्यता असून ही चोरी स्थानिक व्यक्तींनी केली असल्याचा संशय थोरात यांनी व्यक्त केला.
दरम्यान, येथे वारंवार होणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आस्मानी तसेच सुलतानी संकटामुळे पिचलेला शेतकरी या वारंवार घडणाऱ्या शेतमाल चोरीच्या घटनांमुळे पुरता बेजार झाला आहे. या सर्व चोरीच्या घटनांचा विचार करता येथील ग्रामस्थांनी एकत्र येत अधिक सतर्कपणे लक्ष ठेवून या स्थानिक चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे .