मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून मोहन भागवतांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता ब्राह्मण महासंघानेही भागवतांवर हल्लाबोल करत टीका केली आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याची गरज असल्याचे विधान केले आहे. दरम्यान, मोहन भागवतांच्या या विधानावर ब्राह्मण महासंघाने तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. “त्यांचं वक्तव्य चुकीचं आणि पूर्ण अभ्यासाशिवाय केलेलं आहे. त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातल्या काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. पण असं न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचं विधान त्यांनी केलं”, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.
“मोहन भागवतांनीच पापक्षालन करण्याची गरज आहे. इथला हिंदू नराधमांच्या हातात देण्याचं पाप तुम्ही करण्याचा विचार करत आहात. तुम्ही पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही देशात जातीयवाद वाढवत आहात”, अशा शब्दांत आनंद दवेंनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.