Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून ‘मिशन 45 प्लस’ अत्यंत गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेषत: भाजपने आपल्या आमदारांना खास टार्गेट दिलेले आहे. जो आमदार लोकसभेत टार्गेट पूर्ण करणार नाही त्या आमदारांचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तविली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले की, जो आमदार लोकसभेच्या उमेदवाराला लीड देईल त्याला पुन्हा तिकीट देण्यात येईल, आणि ज्याच्या मतदारसंघात लीड कमी मिळेल त्याचे आमदारकीचे तिकीट धोक्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराशी मतभेद असले तरीही स्वतःच्या विधानसभेसाठी आमदारांना काम करावे लागणार आहे.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघासाठी उद्या म्हणजेच शुक्रवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात प्रचारसभा झाल्या. तर राज्यातील अन्य लोकसभेचे मतदान दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात होणार आहे.
त्यासाठी बड्या नेत्यांच्या सभा देखील नियोजित आहेत. असे असताना राज्यात मिशन 45 प्लस पूर्ण करण्यासाठी एकीकडे हे दिग्गज नेते कामाला लागले असताना दुसरीकडे भाजपने आपल्या आमदारांना देखील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातून लीड देणे बंधनकारक केले आहे.
प्रत्येक आमदाराचं रिपोर्ट कार्ड होणार Lok Sabha Election 2024 ।
सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजप नेत्यांनी विधानसभा आमदारांना नुसते टार्गेटच दिले नाही तर त्यानुसार प्रत्येकाचे रिपोर्ट कार्डच तयार केले जाणार आहे. त्यांच्या मताधिक्याचा उमेदवाराला कसा फायदा झाला, याचे मूल्यमापन यावेळी केले जाणार आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विधानसभा आमदार आणि इच्छुक उमेदवारांना तशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुन्हा आमदारकीचे स्वप्न पाहायचे असेल, तर आतापासूनच जोमाने कामाला सुरुवात करावी लागणार आहे.