नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी उद्या म्हणजेच रविवारी देशातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. शासकीय आणि खासगी कंपन्यांनी रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त आपले कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी लोकांनी अजिबात घराबाहेर पडू नये. आपापल्या घरातच राहावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
जनता कर्फ्यूदरम्यान बंद राहणार खालील सेवा…
* जनता संचारबंदीचे पालन करण्यासाठी पुढील निर्णय घेण्यात आले आहेत.
* भारतीय रेल्वेकडून जनता कर्फ्युनमित्त शनिवारी रात्रीपासून रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत कोणतीही पॅसेंजर गाडी कोणत्याही स्थानकावरून सोडण्यात येणार नाही.
* रविवारी सर्व इंटरसिटी गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
* रविवारी पहाटे चार वाजल्यापासून सर्व मेल आणि एक्स्प्रेस गाड्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
* मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद या शहरातील उपनगरीय वाहतूक सेवेतही मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.
* गो एअरनेही आपली सर्व देशांतर्गत विमान उड्डाणे रविवारी बंद ठेवली आहेत.
* इंडिगोने रविवारी केवळ 60 टक्के विमान उड्डाणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
* दिल्ली मेट्रोची सेवा रविवारी जनता संचारबंदीच्या काळात बंद राहणार आहे.
* ओला-उबरनेही आपल्या सर्व वाहनचालकांना रविवारी वाहन न चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत.