मुंबई : राज्यसभा निवडणुकांसाठीचे मतदान सुरु आहे. या मतदानाचाही वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आहे. पक्षांच्या अनेक आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. मात्र महाविकास आघाडीचे अटकेत असलेले आमदार नवाब मलिक आणि अनिल देखमुख यांना मतदानासाठी परवानगी मिळणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. दरम्यान सत्र न्यायालयाने या दोघांना मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर उच्च न्यायालयात मतदानासाठी विनंती करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाकडूनही सत्र न्यायालयाच्या निकालाप्रमाणे मतदानासाठी नकार देण्यात आला आहे.
याबाबतची सुनावणी आज पार पडली यावेळी नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी मागितली आहे. सदर याचिकेमधील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मागीतली आहे. थोड्याच वेळात यासंदर्भांतील सुनावणी नव्या याचिकेसह होणार आहे.
दरम्यान आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाची बाजू महाधिवक्ते अनिल सिंग यांनी मांडली. त्यावर नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी म्हंटले की , मतदान हा घटनात्मक अधिकार आहे आणि तोच आम्ही मागत आहोत. शिवाय नवाब मलिक कोठडीत नसून रुग्नालयात आहेत त्यामुळे काही वेळ दिला तर त्यांच्या घटनात्मक अधिकाराचा वापर करता येईल. तर या याचिकेत मलिकांनी केवळ तात्पुरत्या जामीनाचा उल्लेख केला आहे. यात बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याचा उल्लेख नाही. ही याचिका सुनावणी योग्यच नाही. असे सरकारी वकिलांनी सांगितले. तर अनिल देशमुख त्यांच्या वतीने आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला.