पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शहरात मुक्कामी असलेल्या कालावधीत शहरात तीनवेळा स्वच्छता केली जाणार आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी त्यासाठी तब्बल 700 कर्मचारी तीन शिफ्टमध्ये नियुक्त केले जाणार आहेत. याशिवाय, वारकऱ्यांसाठी पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी 1100 मोबाइल टॉयलेटची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. याशिवाय, आतापासूनच पालखी मार्गावरील राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.
करोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी या दोन्ही पालख्या पुणे शहरात 22 जून रोजी मुक्कामी येणार असून 24 जून रोजी पहाटे मार्गस्थ होणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात, तर तुकाराम महाराज यांची पालखी भवानी पेठेतील विठोबा मंदिर येथे मुक्कामी असणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून दोन आठवडे आधीच शहर स्वच्छतेचे नियोजन सुरू केले आहे.
या मुक्कामाच्या ठिकाणी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या 600 कर्मचाऱ्यांसोबत अतिरिक्त 75 कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यांच्याकडे रस्त्याचे झाडणकाम, जमा होणाऱ्या कचऱ्यांची विल्हेवाट लावणे अशी कामे असणार आहेत. याशिवाय, राज्य महिला आयोगाच्या सूचनांनुसार, पहिल्यांदाच वारीमध्ये भवानी पेठेत महिलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील महापालिका व खासगी शाळेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, न्हाणी घर असणार आहे. तर स्वतंत्र कक्ष असलेल्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन देण्याची व्यवस्था असणार आहे.