पुणे : महापालिकेकडून शहरातील मैलपाणी स्वच्छ करण्यासाठी उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी)ची पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता कमी झाल्याने या प्रकल्पातील शुद्ध केलेले पाणी प्रदूषणाबाबत असलेल्या मानकात बसत नाही. त्यामुळे, या प्रकल्पांची क्षमता पुन्हा वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची क्षमता वाढविण्यात यावी, अशा सूचना केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून महापालिकेस देण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या “नमामी गंगा’ प्रकल्पांतर्गत आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेचे शहरात सुमारे 11 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आहेत. मात्र, त्यांची उभारणी जवळपास 15 ते 20 वर्षांपूर्वी झालेली असल्याने त्यांची शुद्धीकरण क्षमता कमी झाली असून शुद्ध केलेल्या पाण्यातील “सीओडी’ तसेच “बीओडी’चे प्रमाण कमी आढळत आहे. त्यामुळे भविष्यात नदीप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
शहरात सध्या दरदिवशी सुमारे 800 ते 850 एमएलडी सांडपाणी तयार होत असून त्यातील सुमारे साडेपाचशे एमएलडी पाण्यावरच पालिकेस प्रक्रिया करता येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुठा नदी प्रदूषित होत आहे. परिणामी केंद्राकडून शहरासाठी जायका प्रकल्पांतर्गत 800 कोटींचा निधी देण्यात आला असून त्याद्वारे नवीन 11 सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत. मात्र, त्यासोबतच शहरात सध्या कार्यरत असलेल्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत.