नवी दिल्ली – यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावून देशाला संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावण्याची ही त्यांची सलग दहावी वेळ आहे.
त्यांच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मनमोहन सिंह या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन किमान दहा वेळा तिरंगा फडकावला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांचा या यादीत समावेश होणार आहे. हा मान मिळवणारे ते पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.
दरम्यान, 2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहेत. त्यामुळे यंदा पंतप्रधान मोदी कुठली महत्त्वाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी राजधानी दिल्लीत 10 हजारांहून अधिक जवान तैनात असणार आहेत.
तसेच, यंदा स्वातंत्र्य दिनानिमित्त 1800 विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या पाहुण्यांमध्ये 400 हून अधिक सरपंच तसेच 660 हून अधिक व्हायब्रंट गावातील लोकं समाविष्ट आहेत. यंदा त्यांना कार्यक्रमासाठी खास निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
एवढेच नाही तर शेतकरी उत्पादक संघटना योजनेशी संबंधित 250 जणांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन हा अतिशय खास असणार आहे.