नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी फाळणीच्या वेळी प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, धर्माच्या आधारावर देशाची फाळणी हा एक “काळा अध्याय” आहे. इतिहासातील या घटनेची देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
फाळणीच्या आठवणी जागवताना ते म्हणाले की, फाळणीच्या कारणामुळे कोट्यवधी लोक विस्थापित झाले. देशाला याची मोठी किंमत चुकवावी लागली आणि आजही अनेक लोक संकटाचा सामना करत आहेत. फाळणी विनाशाच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी ट्विटर संदेशात ही प्रतिक्रीया नोंदवली आहे.
फाळणीच्या वेळी भारतीयांना झालेल्या दु:खाची आणि बलिदानाची राष्ट्राला आठवण करून देण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावह स्मरण दिन’ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी सन 2021 साली केली होती.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टला देशाची फाळणी झाली. प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यदिन हा कोणत्याही राष्ट्रासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा प्रसंग असतो; मात्र, स्वातंत्र्याच्या गोडव्यासोबत फाळणीचा आघातही झाला. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतीय राष्ट्राचा जन्म फाळणीच्या हिंसक वेदनांसह झाला ज्याने लाखो भारतीयांवर कायमचे डाग निर्माण केले.त्यामुळे भाजपच्यावतीने दरवर्षी फाळणीच्यावेळी झालेल्या घटनांच्या आठवणी जागवल्या जातात आणि त्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते