नवी दिल्ली : पुढील दोन वर्षात टोलनाक्यांपासून मुक्तता होणार,अशी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. रस्ते वाहतुकीसंदर्भात केलेल्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. “पुढील दोन वर्षात महामार्गांवर कोणताही टोलनाका नसेल, यामुळे वाहनांना पैसे भरण्यासाठी थांबण्याची किंवा वाहनाची गती कमी करण्याची गरज नाही,” असे देखील नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
अॅसोचॅम कॉन्फरन्समध्ये नितीन गडकरी बोलत होते यावेळी त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मंत्रालय सध्या जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने टोल वसूल करण्याच्या प्रस्तावावर काम करत असल्याची माहिती दिली. सर्व नवी वाहने जीपीएस सिस्टमशी जोडले जातील असेही यावेळी त्यांनी सांगितले.
जीपीएस यंत्रणेच्या सहाय्याने बस तसेच ट्रक चालकांकडून टोल वसूल केला जाणार आहे. जीपीएस यंत्रणा या वाहनांनी किती अंतर पार केले आहे याचे मोजमाप करून आपोआप टोलची रक्कम वसूल केली जाईल. सध्या फास्टटॅग या नव्या प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांचा वेग कमी होण्याचं किंवा थांबवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे समोर आले आहे.
नितीन गडकरी यांनी चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय महामार्गावर वसूल होणाऱ्या टोलची रक्कम ३४ हजार कोटी इतकी असेल अशी माहिती दिली आहे. गतवर्षी ही रक्कम २४ हजार कोटी इतकी होती असेही त्यांनी सांगितले.