प्रशासन आणि पोलीस यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
पुणे – विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार काम करून प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मितेश घट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रियेबाबत काटेकोर नियोजन आवश्यक आहे. निश्चित मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्राची पाहणी करून सुविधांचा आढावा घ्यावा.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, आयोगाच्या सूचनांनुसार यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे सांगून मतदारांच्या तक्रार निवारणासाठी मतदारसंघनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.