मुंबई – “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीने सध्या राज्याच्या राजकारणात एक वादळ निर्माण केले आहे. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत ‘कुछ तो गडबड है..!’ च्या चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले. दरम्यान, त्यानांतर हीच चूक सुधारत शिवसेनेकडून पुन्हा एकदा जाहिरात छापण्यात आली होती. मात्र, असं असलं तरी अद्यापही विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले जातात आहे.
दरम्यान, यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे. ते शनिवारी (17 जून) कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना अतिशय कडक शब्दात प्रत्युत्तर दिल्याचं दिसुन आलं आहे.
यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे.’ असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “सध्या राज्यातील विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. भाजपा-शिवसेनेते कसं वितुष्ठ निर्माण होईल, लावालाव्या कशा करायच्या हे सुरू आहे. विरोधकांना बघवत नाही. आमच्यात सर्व गोष्टी चांगल्या सुरू आहेत. आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं, विकास करण्याचं काम करत आहोत.’ असं देखील श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.