कोल्हापूर – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सरकारला कोणताही धोका नाही. आमचे सरकार मजबूत स्थितीत आहे, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हिरेन मृत्यूप्रकरणी अटक केल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढतील किंवा मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारला कुठलाही धोका नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना आम्ही योग्य पद्धतीने उत्तर दिली आहेत. हा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे आहे. खरेतर विरोधक हे टीका करण्याचे काम करणारच आहेत. मात्र, त्यांच्या टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
यापूर्वी निलंबित केलेल्या वाझे यांना कशी काय पुन्हा नियुक्ती केली असा प्रश्न आयशा बेगम यांनी केला आहे. यावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, 2020 साली सचिन वाझे यांची केलेली नियुक्ती ही नियमानुसारच केली आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन करून त्यांची नेमणूक केली नाही. दरम्यान, वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे कशा पद्धतीचे संबंध होते, त्यावर नितेश राणे यांनी केलेली टीका माहीत नाही, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्यात आलेल्या वाहनाप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांना “एनआयए’ने अटक केली आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेनेवर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.
“एनआयए’ने सचिन वाझेंना केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात हेबियास कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.