देहूगाव (वार्ताहर) – सरकारला सदबुद्धी द्यावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावे, असे सांकडे संत तुकाराम महाराज चरणी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी घातले.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील रविवारी (दि. ७) दुपारी तीर्थक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या दर्शनार्थ आले होते. त्यांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन सांकडे घातले. त्यानंतर संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे आदींची संस्थानच्या कार्यालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांनी बोलताना त्यांनी माहिती दिली.
मावळातील निवडणुकीत पाठिंबा कोणाला असणार आहे ? यावर मनोज जरांगे म्हणाले की, पाठिंबा देण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. समाजाने ठरवावे काय करायचे, काय नाही करायच, कोणाला पाडायचे, कोणाला निवडून आणायचे. परंतु, सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाजूने उभा पाहिजे. ते मराठ्यांच्या या कायद्याच्या बाजूने असणारा असावा, हे समाजाने लक्षात ठेवावे.
मात्र, राज्यभरात आपण एकही अपक्ष उमेदवार दिलेला नाही आणि कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. सगळ्या बांधवांना उभा राहण्याचा अधिकार आहे आणि स्वतः त्यांचे वैयक्तिक मत आहे, म्हणून ते उभे राहू शकतात. कुणी आंदोलनाचा उपयोगही करू नका. आपली जात ही खूप दिवसांनी एकत्र आली आहे. तुम्ही तुमच्या बळावर रहा, पण आमचा कुठलाही उमेदवार नाही.
राजकारण आमचा मार्ग नाही
विधासनभेबाबत ते म्हणाले की, प्रत्येक वेळी अन्याय करणार असाल, गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करून गोर गरिबांची हजारो मुले गुंतवण्याचे ठरवले असेल तर, विधानसभेची तयारी करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी सगे सोयऱ्याची अंमलबजावणी द्यायचे ठरवले नसेल व चारही बाजूंनी आमचीच, गोरगरिबांची कोंडीत पकडणार असाल तर, काय करायचे. धनगर बांधव, बाराबलुत्यांची वेगळा प्रवर्ग, मुस्लिम बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न आहे.
दलितांचा प्रश्न आहे. जर योग्य निर्णय होणार नसेल तर, आमचा नाईलाज आहे, आम्हाला विधानसभा लढवावी लागेल. पण, राजकारण आमचा मार्ग नाही. मात्र, आमचे आरक्षण आम्हाला द्यावे. मला राजकारणाच काही घेण देण नाही आणि समाजाला सुद्धा नाही, असे मनोज जरांगे या वेळी म्हणाले.