कोल्हापूर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकरून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
अनिल देशमुखांचे सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळेच ते चौकशीसाठी हजर झाले, असे मी कालच बोललो होतो. सर्व सामान्य माणूस सापडत नसेल तर सर्च वॉरंट निघाले असते. काहीजण जात्यात आहेत तर काहीजण सुपात आहे, असा सूचक इशाराच पाटील यांनी दिला.
अजित पवार यांची 12 कोटींची मालमत्ता सील करण्यात आली आहे. एकामागे एक रांग लागली आहे. मंत्रिमंडळाला आता नैतिक अधिकार उरलेला नाही. उद्धवजी आता तरी सरकार बरखास्त करा. नैतिकता असेल तर राजीनामा द्या. पुन्हा एकदा निवडणूक होऊन जाऊ द्या, असे आव्हानच पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही खोचक टोला लगावला. संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. त्यावरुन “बघा बघा कशाला काही असेल तर आताच कारवाई करा. गृहमंत्री आताही तुमचाच आहे’, अशा शब्दात पाटील यांनी राऊतांना आव्हान दिले आहे.