बिबवेवाडी, दि. 14 (हर्षद कटारिया) -पुणे शहराला रविवारी (दि. 11) मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या. यामागील कारण शोधण्याकरिता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहर, उपनगरांत पाहणी दौरा केला. आता, त्यांच्या अहवालात काही कारणे मांडली जातील. परंतु, ओढे, नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश खुद्द आयुक्तांनी दिले होते परंतु, त्या आदेशाची अंमलबजावणीच झाली नसल्याने शहर, उपनगरांत पूरस्थिती निर्माण झाल्याचे उघड होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. हवामान विभागानेही दि.19 मे ते 21 मे दरम्यान शहर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावेळी शहर आणि उपनगरांत पावसाळ्यापूर्व ओढे, नाले सफाईची कामे सुरू झालेली नव्हती. याबाबत नागरिकांसह अनेक आजी-माजी नगरसेवकांनी ही काम तातडीने करण्याबाबतची निवेदने आयुक्तांना सादर केली होती. त्यामुळे आयुक्त विक्रम कुमार यांनी तातडीने आदेश काढत दि. 15 जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पालिकेच्या तीन अतिरिक्त आयुक्तांवर विभागनिहाय सोपविली होती. परंतु, त्याच दरम्यान पाऊस सुरू झाल्याने शहर, उपपगरांतील सफाईची कामे अपूर्ण ठेवण्यात आली. पालिकेच्या नाले सफाई कामाच्या नियोजनावर पाणी फिरले होते.
महापालिकेचे नियोजन फसलेच…
नाले, ओढे, कल्व्हर्ट, पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाइन स्वच्छतेची कामे क्षेत्रीय कार्यालयांद्वारे केली जात होती. परंतु, त्या-त्या भागात राजकीय दबाव, कामात हस्तक्षेप या कारणातून ही कामे रेंगाळत होती. त्यामुळे ही कामे पालिका प्रशासनाने स्वत: हाती घेतली होती. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून ही कामे क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही ही कामे पूर्ण झाली नाहीत. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवकांकडे तक्रारी केल्यानंतर आयुक्तांकडे तक्रारी गेल्या. याची दखल घेत प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिरिक्त आयुक्तांना आदेश देत ही कामे दि. 15 जूनपर्यंत पूर्ण करण्याची सूचना होती. परंतु, ही कामे पूर्ण झालीच नाहीत. याच कारणातून शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याचे उघड आहे.
समाविष्ट गावांकडे पूर्ण दुर्लक्ष…
महापालिकेलगतच्या गावांचा समावेश झाल्याने या गावांतील ओढे, नाले सफाईची जबाबदारीही पालिकेवर आहे. जुन्या आणि नव्या हद्दीतील नाले आणि उपनाल्यांची एकूण लांबी 647 किलोमीटर आहे. त्यावर एकूण 742 कल्व्हर्ट आणि 12 बंधारे आहेत. यापैकी 97 किलोमीटर लांबीचे नाले आणि 221 कल्व्हर्टची सफाई होणे गरजेचे होते. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्याने पालिकेत समाविष्ट गावांतही पूरस्थिती निर्माण झाली.
पावसाळापूर्वीची नालेसफाईची कामे झाली असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे असले तरी त्यात पूर्ण तथ्य नाही. ही कामे झाली असती तर शहरात पूरस्थिती निर्माण झालीच नसती. पावसाळी वाहिन्या तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरलेच नसते. प्रशासनाच्या नियोजन शून्य कामाचा फटका पूर्ण शहराला बसला आहे.
– संतोष नांगरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
पर्वती मतदार संघ