उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात दोन दलित बहिणींचे मृतदेह गावाबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलींच्या आईचा आरोप आहे की,’बुधवारी दुपारी ३ तरुणांनी तिच्या मुलींना पळवून नेले आणि नंतर त्यांची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवले.’
ही घटना निघासन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तामोलिन गावातील आहे. मृतदेह सापडल्यानंतर लोकांनी रास्ता रोको करून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करत पोलीस मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी एसपी संजीव सुमन यांच्यासोबत जमावाने वादावादीही केली.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी छोटूला ताब्यात घेतले आहे. त्याच्या आणखी तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत मुलींच्या आईने सांगितले की, या घटनेत सहभागी असलेले आरोपी शेजारील लालपूर गावचे रहिवासी आहेत.
पोलिसांशी स्थानिकांची झाली वादावादी
शेकडो लोकांनी निघासन चौक अडवला, त्यानंतर जिल्ह्याचे एसपी संजीव सुमन मोठ्या पोलीस बंदोबस्तात तेथे पोहोचले. ‘राजकारण करू नका’, असे त्यांनी संतप्त जमावाला सांगितले. यादरम्यान त्यांचा लोकांशी वादही झाला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी गर्दीतून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा मुख्यालयात पाठवला.
डॉक्टरांची समिती पोस्टमार्टम करणार
दोन्ही अल्पवयीन मुलींचे मृतदेह लखीमपूर मुख्यालयातील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले आहेत. जिथे डॉक्टरांचे एक पॅनेल शवविच्छेदन करेल. या पॅनलमध्ये महिला डॉक्टरांचाही समावेश असेल. संपूर्ण शवविच्छेदनाची व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलीस कुटुंबीयांकडून तहरीरची वाट पाहत आहेत.
आई म्हणाली,’ माझ्या दोन्ही मुलींना जबरदस्तीने घेऊन गेले’
दोन्ही मृत बहिणींच्या आईने सांगितले की, “ती बुधवारी दुपारी तिच्या 15 आणि 17 वर्षांच्या दोन मुलींसह घराबाहेर बसली होती. काही वेळाने मुलींना बाहेर सोडून ती कपडे घालण्यासाठी घरात गेली आणि त्याचवेळी दुचाकीस्वार तीन तरुण तेथे पोहोचले.
महिलेने पुढे सांगितले की, ‘तीनपैकी दोन वेगवेगळ्या मुलांनी त्यांच्या मुलींना ओढून नेले आणि एका मुलाने बाईक सुरू केली आणि दोघांसह घटनास्थळावरून पळ काढला.’ ती पुढे म्हणाली, ‘तीन मुलं रोज यायची. आज तो आला तेव्हा माझी मुलगी बाजूला बसली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिघेही लालपूरचे रहिवासी होते. मी आत जाताच पिवळा शर्ट आणि पांढरा शर्ट घातलेल्या दोन मुलांनी माझ्या मुलींना ओढून नेण्यास सुरुवात केली, तर निळा शर्ट घातलेल्या तरुणांनी गाडी सुरू केली आणि त्यानंतर तिघेही मुलींसह पळून गेले. महिलेने सांगितले की, यावेळी ती मुलींना वाचवण्यासाठी धावली आणि तिचे कपडेही फाटले.
पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
या घटनेबाबत एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की,’आयजी रेंज लखनऊ लक्ष्मी सिंह घटनास्थळी आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणानंतर यूपीमध्येही राजकारण तापले असून समाजवादी पक्ष राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर हल्लाबोल करत आहे.’