नवी दिल्ली, – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची गुरूवारी एक दिवस आधीच सांगता झाली. संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेत अखेरच्या दिवशीही वातावरण तप्त बनल्याचे पाहावयास मिळाले. विरोधकांनी प्रामुख्याने इंधन दरवाढीच्या सत्रावरून आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने राज्यसभेचे अध्यक्ष एम.व्यंकय्या नायडू प्रथेनुसार होणारे समारोपाचे भाषणही करू शकले नाहीत.
संसदेचे दोन टप्प्यांतील अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू झाले. अधिवेशनात 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज 11 फेब्रुवारीला समाप्त झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे कामकाज 14 मार्चपासून सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात दिल्लीतील तीन पालिकांचे एकीकरण आणि फौजदारी प्रक्रिया ओळखीशी संबंधित महत्वाची विधेयके मंजूर झाली. अधिवेशन एक दिवस आधीच गुंडाळण्यात आल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. गगनाला भिडलेल्या इंधन दरांच्या मुद्द्यावरील चर्चेपासून पळ काढण्याच्या उद्देशातून अधिवेशन आटोपते घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी राज्यसभेत अध्यक्ष नायडू आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. इंधन दरवाढीच्या सत्रावर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. मात्र, ती मान्य झाली नाही. खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी या शिवसेना सदस्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून गोळा केलेला निधी हडपल्याच्या आरोपावरून सोमय्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या प्रकरणी चर्चा करण्याच्या शिवसेना सदस्यांच्या मागणीला कॉंग्रेस सदस्यांनी पाठिंबा दर्शवला. संपूर्ण अधिवेशनात दरवाढीचा मुद्दा उपस्थित करू देण्यात आला नाही.
किमान आयएनएस विक्रांत घोटाळ्यावर तरी चर्चा होऊद्या, अशी भूमिका कॉंग्रेसच्या काही सदस्यांनी घेतली. मात्र, ती मागणीही अमान्य झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने राज्यसभेत गदारोळ झाला. त्यामुळे नायडू यांनी समारोपाचे भाषण न देताच सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित केले.