नवी दिल्ली -राष्ट्रीय स्तरावर भाजपशी दोन हात करण्यासाठी केवळ विरोधकांची आघाडी पुरेशी ठरणार नाही. जनतेने भाजपविरोधात उठाव करण्याची खरी गरज आहे, अशी भूमिका आम आदमी पक्षाने (आप) मांडली आहे.
भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशातून काही विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. त्याबाबत आपची भूमिका काय, असा प्रश्न त्या पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना गुरूवारी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वरील भूमिका मांडली.
जनतेचे लक्ष मुख्य मुद्द्यांपासून विचलित करून भाजप निवडणुका जिंकतो. मात्र, सरकार स्थापनेनंतर तो पक्ष जनहिताचे काहीच करत नाही. भाजपचे ते तंत्र जनतेला समजू लागले आहे. त्यामुळे जनता त्या पक्षाविरोधात उभी राहू लागली आहे.
त्यातून जनता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रशासनाच्या मॉडेलवर विश्वास दाखवू लागली आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी आपने दिल्लीनंतर पंजाब या दुसऱ्या राज्यात सत्ता मिळवल्याचा संदर्भ त्यांनी दिला.